(Human rights) लोकमाता अहिल्याबाईंच्या नावाने असलेल्या महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासकांच्या ‘डांगेगिरी’चे मोठे उदाहरण समोर आले आहे. शहरातील स्टेट बँक चौकातील विजय हनुमान मंदिर ते चांदणीचौक या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या कडेला मोदीच्या गावाचे काही गरीब कष्टकरी गुजराती कुटुंबे निवारा करून रहातात. त्यातील काहीजण बॅट तयार करून विकतात तर काही बिहारची मंडळी नर्सरीतील झाडे विकतात. यामधे अनेक महिला भगिनी असून काही शाळेत जाणारी लहान मुले मुली आहेत. यातील दोन बाळंतीण महिलांना आज प्रशासकांच्या ‘डांगेगिरी’ने बेघर केल्याचे समोर आले. यातील एक महिला दोन महिन्यांची सिझरिअनचे ऑपरेशन झालेली ओली बाळंतीण आहे तिच्या लेकराचे नाव ‘धनुष’ तर दुसरी सहा महिन्यांची बाळंतीण तिच्या लोकरीचे नाव ‘शुभम’ आहे. या महिला आज रात्री उड्डाणपुलाच्या ज्या खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे चित्र काढलेले आहे. त्याखाली लेकरांना रडत रडत झोका देताना दिसत होत्या. बेघर झाल्याने त्यांनी या ‘शिवजन्म’ खांबाचा निवारा घेतल्याचे दिसले.
(Human rights) अधिक माहिती घेतली असता आज सकाळपासून मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यांचे दुपारपासून दोनदा कौटुंबिक साहित्य, जेवणाचे भांडेकुंडे, ताटवाट्या, संसाराचे साहित्य, काहींचे बॅटचे सामान तर काहींची नर्सरी झाडे अतिक्रमण विभागाने मोठ्या गाड्या आणून भरून नेले. त्यांना विचारले असता ते वरिष्ठांचे नाव सांगतात. कोणाचे लेखी आदेश आहेत का नाही असे उत्तर येते.
(Human rights) मुळात हा रस्ता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा आहे. महानगरपालिकेला या रस्त्याकडेला असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचे नाव सांगून दोन ओल्या बाळंतीण महिलांसह अनेक लहान लेकरांना बेघर करण्याचे पाप ‘डांगेगिरी’मुळे झाले आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या महिला आहेत. राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली चाकणकर महिला आहेत. राज्यात मानवीहक्क आयोगाचे कामकाज चालते. या सर्वांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले पाहिजे.
फक्त छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेऊन चालणार नाही. त्यांच्या विचाराने काम करावे लागेल. सामान्य रयतेला दु:ख देता कामा नये. भले ती जनता मोदीच्या गुजरातची असेल, पण त्या आपल्याच देशातील भारतमाता आहेत. या गंभीर प्रकारामुळे शहरातील महिला वर्गातून नाराजीचा सूर येत आहे. बाळंतीणीला बेघर करण्यासारखे मोठे पाप असल्याची महिलांची भावना आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जन्माचे चित्र असलेल्या उड्डाणपुलाच्या खांबाखालीच या दोन बेघर ओल्या बाळंतीणींनी रडतरडत आपल्या लेकरांना झोके देत होत्या
गरीबांच्या मुळावर उठलेल्या मनपा प्रशासकीय ‘डांगेगिरी’चा जाहीर निषेध !