अहमदनगर | २२ जानेवारी | प्रतिनिधी
(democracy) आपला प्रिय भारत देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राजकीय व व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने लोकशाहीला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देशपातळीवर राजकीय अंगाने भांडवलदारी व्यवस्थेचे उदात्तीकरण सुरु आहे. अशावेळी हुकुमशाही, राजेशाही व्यवस्थेला नाकारणारी व सर्वहारा वर्गाला समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली लोकशाही टिकली पाहिजे व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतू समोर ठेऊन अहिल्यानगरमध्ये सन २०२२ पासून लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन हा उत्सव सुरू केला. या वर्षी ता. २५ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली.
हे ही पहा : समतेची गाणी, #लोकशाही उत्सव – २०२४ #अहमदनगर #live on #रयत समाचार
(democracy) हा लोकशाही उत्सव दरवर्षी प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्य दिन या दरम्यान आयोजित करण्यात येतो. यावर्षी २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्या कॉलनी, कल्याण रोड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ता.२६ जानेवारी रोजी प्रसिद्ध वास्तवपटकार वरुण सुखराज यांच्या ‘टू मच डेमॉक्रसी’ या शेतकरी आंदोलनाच्या वास्तवपटाचे प्रदर्शन व चर्चेचे आयोजन शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, ता. पारनेरला करण्यात आले. तर ता. २७ व २८ जानेवारीला डॉ. प्रशांत शिंदे, अशोक सब्बन व डॉ. बापू चंदनशिवे हे वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन लोकशाहीवर व्याख्याने देणार आहेत.
(democracy) ता. २९ जानेवारीला अहिल्यानगरमध्ये शिवाजी नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचा प्रचार प्रसार करणारे पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. तर ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक, सावेडी येथे प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम व ख्यातनाम ऊर्दू कवयित्री डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात प्रतिभा अहिरे (कन्नड), मुसेब आझमी (आझमगढ, उत्तर प्रदेश), नोमान सिद्दीकी (गोरखपूर, उत्तर प्रदेश), प्रकाश घोडके (पुणे) आणि बिलाल अहेमदनगरी सहभागी होणार असल्याची माहिती लोकशाही उत्सवाच्या निमंत्रक सोनाली देवढे, संध्या मेढे, ॲड. विद्या जाधव, प्रमिला कार्ले, सुरेखा आडम आणि समृद्धी वाकळे यांनी दिली. या सर्व उपक्रमात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खजिनदार अशोक सब्बन यांनी केले.
हे हि वाचा : गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.